Sunday, 1 May 2016

आज सकाळी जेव्हा त्याला जाग आली तेव्हा त्याला शासकीयदृष्टीने सत्तावनाव्वे वर्ष लागले होते.(तसा तो पूर्वीपासून होता म्हणा पण सरकार दफ़्तरी त्याच्या जन्माची नोंदणी १९६०ची)
    इतिहासाचे ओझे,वर्तमानाची लक्तरे आणि भविष्यातला काळोख.तिथे अजूनतरी उजेड दिसत नव्हता.पण तसा तो आशावादी.भल्यामोठ्या कर्जाचा भारा डोईवर होता धाकटा भाऊ त्याच्या वहीवाटीचा हिस्सा मागत होता.तसा हा कज्जा बऱ्याच दिवसांपुर्वीचा,थोरल्याने समजावले होते आणि धाकटाही पटवून घेत होता.पण आता चांगला ऐरणीवर आला होतं प्रकरण."नव्या वाढदिवसाची नवी भेट" त्यानं आपलीच समजूत घातली.हे सारं कमी कि काय म्हणून त्याचा प्रत्येक 'अवयव' त्याच्याशीच द्रोह मांडत होते ,स्वतःच्या अस्तित्वाची सारखी जाणीव करून देत होते."वय झालं कि व्हायचं असंच." पुन्हा एक समजूत.
          आन्हिकं उरकून अंगावरती जुनाट,जीर्ण झालेली राजवर्खी कपडे घालून त्याने एकदा आरशात न्याहाळलं.(तो हे फक्त आजच घालतो)आपण रुबाबदार दिसतो या कल्पनेनं आजही त्याच्या गलमिशा थरारल्या.डोईला पुणेरी टोपी लेवून स्वारी एकदाची तयार झाली.बाहेर पडताना घरात पाण्याचा थेंब नव्हता.टँकर दुपारी यायचा..पुन्हा त्याला रांग,त्यात आज रविवार म्हणजे दुष्काळात तेरावा."यावर्षी तरी बक्कळ पाऊस पडू दे रे बाबा" म्हणून देवघरातल्या विठोबाला साकडं घातलं.
दाराबाहेर पडताना पावला गणिक कर्रकर्र आवाज करणारी कोल्हापुरी पायतान त्याने पायात चढवली.गेल्या कित्येक वर्षांचा त्याचा हा नित्यक्रम होता,पायतानं बदलत गेली,पण धुळीने माखलेली वाट तशीच होती.न बदलणारी.फुरस्यासारखी गिरकी घेऊन बसणारी.सदा नागमोडी.
          झटपट पाऊलं उचलून त्यानं राजभवन गाठलं.तिथं अभिष्टचिंतनाचा स्वीकार केला.सन्मान स्वीकारताना त्याचा गळा भरून आला,आवंढा दाटला त्यामुळे तो काही बोलला नाही.
          त्याच नाव महाराष्ट्र.आमचा महाराष्ट्र आज ५६ वर्षांचा झालाय.
महाराष्ट्र चिरायु होवो.