Monday, 31 October 2016

आमचे पत्र

प्रिय तात्या
        इकडून पाठवलेला फराळ मिळाला असेलच.
हल्ली सगळे शुभेच्छाच पाठवतात फराळ कुणीच पाठवत नाही.उठसुठ फटाके वाजवूं नका सारखे मेसेज पाठवत बसतात.तिकडे न्युयॉर्कला वाजतात का फटाके?आता ३१ डिसेंबरला फटाके उडतात म्हणे तिकडे.किती भारी दिसत असतील ना ते?
आकाशात उंच जात,मग त्यांची रोषणाई डोळ्यांचं अक्षरश: पारणं फेडत असेल.गगनचुंबी इमारती असल्या कि असले फुकटचे सल्ले कुणी देत नसेल बहुतेक.
नाईकांच्या राजाने सिडनीचे फोटो टाकले होते म्हणे फेसबुकला,पाहिलेस का?
       ऑलिंपिकमध्ये सुद्धा वाजतातच कि फटाके,ते सुद्धा आनंददायी.मनमोहक वैगेरे असतात.
डिस्ने लॅन्डमध्ये स्पेशल लाईट शो असतो म्हणे?मी पण म्हणतोय यंदा जाऊन यावं हॉंगकाँगला.पण मला रजा मिळत नाहीये.
               आणि मजा माहितीय का तुला?
या विलायती फटक्यांनी आजिबात प्रदुषण होत नाही म्हणे.म्हणून पुढच्यावेळी इकडून फराळ पाठवला कि तिकडून फटाके पाठव.
कसे?
      
ता.क.
     तिकडे ट्रम्प येईल की हिलरी? कुणीही येवो निवडणुका जिंकल्यावर ते फटाके फोडतात का कळव.
                                                 तुझाच
                                               स.दा.भोळे
                                         
     

Friday, 21 October 2016

संग्राम


“काय मग घरी कधी जाणारेस रे?”
stall वरचा ‘हिंदू’ उचलता उचलता मी संग्रामला विचारलं.
खरंतर ‘घरी कधी जाणार?’ किंवा ‘झालं का रिझर्वेशन?’ असे प्रश्न विचारण्यात हाशील काहीच नसते,त्याची जाण्याची तारीख मला लक्षात राहणार देखील नाही.
पण समोरच्याला तेवढच बरं वाटत(आणि आपण त्यामानाने लवकर जाणार याचा आनंदही होतो.)
“घरी होय?आता कशाला घरी जायला पाहिजे आणि?” आपल्या कोल्हापुरी लहेज्यात तो उत्तरला.
“दिवाळी आलीय ना,घरी नको जायला?”,मी
 “नाही ओ,आता हेच आपलं घर.
इथचं आम्ही लाडू करंज्या बनवणार,
इथचं फटकेपण वाजवणार....अभ्यंगस्नान काय रोजच असतय कि आपलं...!”
स्वत:च्या विनोदावर त्याने एकट्यानेच हसून दाद दिली.
“घरी काही नाही ओ,तिथं गेल्यावर करायचं काय?
अजून किती दिवस? असे टोमणे ऐकणार
कि घरच्यांच्या प्रश्नार्थक नजरांना उत्तर देणारं...त्यापेक्षा इथचं बर कि..काय?
ते तुमचं आयोग जागा काढणा आणि आम्ही पास होईना. ते होईपर्यंत घर नाही बघा आता.",संग्राम
त्याच्या Sarcastic  स्वभावाबरोबर त्याच्या आत काहीतरी जळत असल्यासारखं मला वाटलं.
“चला मग येतो..बसतोय रीडिंगला”
  माझा उजवा हात कडकडून दाबत त्याने माझा निरोप घेतला.सकाळी सकाळी सदाशिवात स्पर्धा-परीक्षा करणाऱ्यांच्या फौजा अभ्यासिकेत जायला निघालेल्या असतात.त्यात तो ही हरवला..
एव्हाना आमच्या चहाची वेळ झाली होती...चहाला गप्पांची उकळी आणावी मी शेजारच्याला विचारलं...
“काय मग झाल का रेल्वेचं रिझर्वेशन?”

     त्याला एकेरी हाक मारावी असं खरं तर त्याच वय नाही,सत्ताविशी-अठ्ठाविशीतलं वय,अंगमेहनत करून कमावलेलं शरीर,उंचीही चांगली सहा फुटाच्या आसपास,चेहऱ्यावर काळजीपूर्वक संगोपन केलेल्या फक्कड मिशा.कोल्हापूरजवळ त्याचं कुठंतरी गाव आहे,घरी उत्तम जमीन आहे,उसाच्या कारखान्यात शेअर्स आहेत...तसं पाहिलं तर नोकरीच काय पण शिक्षणाचीही गरज नाही.
(तसंही आपल्याकडे शिक्षण हे फक्त नोकरी डोळ्यांसमोर ठेऊन घेतात हा भाग अलाहिदा)
       त्याची आणि माझी पहिली भेट जराशी चमत्कारिकच झाली.झालं असं मी पुस्तकाच्या दुकानात गेलो होतो..आणि मला हवी असलेली पुस्तकं काही केल्या उपलब्ध होत नव्हती.
"तो पाटलाचा ठोकळा घ्या की यापेक्षा ?"
  आगंतुकपणे आपल्याला सल्ला देणारा हा कोण म्हणून मी काहीसं त्रासिकपणे त्याच्याकडे पाहिलं,आणि काहीसा हसलो.
"वाचून घ्या हो तो,फायद्याचा आहे.,
आयोग क नाई त्याला लक्षात घेऊनच प्रश्न काढतंय,कळलं काय?"
वास्तविक तो ज्या पुस्तकाची महती गात होता ते मी काळ कि गोर हे पाहिलं नव्हतं.
मग त्या पुस्तकाची रचना,त्यावरून आलेले प्रश्न ,काठिण्य पातळीला (म्हणजे नक्की काय देव जाणे?)अनुसरून असणारा त्याचा कल आणि बदलत्या परीक्षा पद्धतीला अनुसरून त्याची केलेली मांडणी अशी यावर पुढचा अर्धा तास त्याने माझं बौद्धिक (कि शाळा?) घेतली.
"नक्की नक्की,आता लगेच घेतो वाचायला."मी
अत्यंत तीव्रतेने दिलेला होकार हा शहाणी माणसं नकारासारखा समजतात हे गमक बहुदा त्याला ठाऊक नसावं.
    मुक्त विद्यापिठातुन पदवी घेत D.Ed करत स्पर्धा परीक्षा करणाऱ्यांची एक पिढी महाराष्ट्रात उदयाला आली.हाही त्यातलाच एक....

        स्पर्धा परीक्षा करणारे हाच काय सगळेच नमुने कमी आधिक फरकाने असेच.सकाळी उगवतीच्या आधी यांचा दिवस सुरु होतो.उजव्या हातात लोकसत्ता किंवा मटा (केंद्रीय लोकसेवा आयोगाची तयारी करत असेल तर हिंदू आणि एक्स्प्रेस),जोडीला स्पायरल बाइंडिंग केलेल्या नोट्स,एखादं राज्यशास्त्राच पुस्तक,फॉर्मल शर्ट आणि पँट घातलेले,इनशर्ट केलेले अनेक जण तुम्हांला दिसतील.वाचुन वाचून डोळ्यांचा नंबर वाढलेला. मानेवर खडा ठेऊन दिवसभर अभ्यास करायचा आणि पोटापाण्यासाठी रात्री एखाद्या एटीएम मध्ये नोकरी करायची.
         अशावेळी नाश्ता जेवण याबाबी केवळ पोट भरण्यापुरत्या उरतात.Entertainment एखाद्या स्वस्तातल्या थेटरात सिनेमा बघण्यापुरती.

      खरंतर हा एका अशाश्वताकडून दुसऱ्या अशाश्वताकडे जाणारा प्रवास आहे.'डोंगराच्या पलीकडे सुंदर गाव आहे.' या आशेवर माणूस पुढे जात बसतो. रस्त्यातल्या बोचलेल्या काट्याच्या जखमा अनेकांना
दिसत नाहीत.लालदिवा,स्टारडम आदी बाबींकडे मात्र लोकांचे लक्ष सहज जाते.या 'स्टारडम' भुलून चित्रपटाकडे जाणारे होतकरू नट आणि सरकारी मानमरातबाच्या पोटी घरदार सोडून अहर्निश कष्ट करणारे हे विद्यार्थी सारखेच समजावेत का?
      दिवाळी नंतर पुन्हा पुण्यात गेलो कि पुन्हा संग्राम भेटेल,त्याच तडफेने घरदार विसरून अभ्यास करताना.कदाचित काही नवशिक्यांना फुकाचे ब्रम्हज्ञान देतानाही सापडेल एखाद्या चहाच्या टपरीवर.
         आता भेटल्यावर मात्र मी त्याला वेगळा प्रश्न विचारेल(कदाचित तितकाच निरर्थक असलेला)
"काय मग,सुटल्या का जागा?"
आणि पुन्हा एकदा आमच्या बेचव नाश्त्याला गप्पांची फोडणी देता देता तो काहीसा सुसह्य करता येईल.

समाप्त
निखील कुलकर्णी©
सर्व हक्क लेखकाधीन


                                                          

Tuesday, 18 October 2016

विचार न करितां कारण....


         भारताची सर्जिकल स्ट्राईक जितक्या बेमालूमपणे झाली तितक्याच किंवा त्यापेक्षा जास्त तीव्रतेने त्यावर देशात टिप्पणी केली गेली.मग आत्यंतिक राष्ट्रवादाने पेटून पाकिस्तानला संपवण्याची केलेली भाषा असो किंवा मोदीद्वेष्ट्यांनी या स्ट्राईकचे पुरावे मागण्याइतपत केलेला शहाणपणा(?) असो.दोन्हीही अतिरेकी आणि तितकेच विचारहीन.परवा या वादात अजून एक भर पडली.देशाचे रक्षामंत्री मनोहर पर्रीकर यांनी "....कदाचित संघाची शिकवण कामी आली असेल." अशा अर्थाचं एक विधान केलं.(मूळ विधान खाली बघा) आणि सगळीकडे हलकल्लोळ उठला.तो उठणही स्वाभाविकच होतं म्हणा.
       या विधानावरून कुठूनही या हल्ल्याची प्रेरणा संघ,तिथले बौद्धिके,पद्य  यात दडली आहे असं म्हटलं नाही.भाषेचा अर्थ उत्तम लावणारा कुणीही 'कदाचित(maybe)' चा सुयोग्य अर्थ लावतो.(मुद्दलात तो काढायला वेळ कुणाला आहे?असो)
त्यांच्या सांगण्याचं तात्पर्य हे आमची निर्णयकौशल्यता,अचूकता,आक्रमकता हे सारं संघशिक्षेतुन आलं असा होता.वास्तविक इथे पर्रीकर आणि संघाला घेरणे सोपे होते."एक 'सांस्कृतिक संघटना' तुम्हांला surgical strike ची प्रेरणा देते म्हणजे तुम्ही युद्धखोर आहात,फॅसिस्ट आहात"वैगेरे सरावाचे आरोप संघावर करता येणं शक्य होतं.खरंतर यावर त्यांची उत्तम कोंडी झाली असती.राहुल गांधी यांना देखील बोलायला अजून एक मुद्दा मिळाला असता,चॅनेल्सला टीआरपी मिळाला असता,पेपरला रकानेच्या रकाने भरून लिहिता आलं असतं.पण हा सगळा फायदा या त्रयी गमावला तो चुकीचा अर्थ काढून.(त्यामुळे चुकीचा अर्थ काढताना तो निदान स्वतःसाठी तरी बरोबर असेल याची काळजी घ्यायला हवी.)
   आरोपांच्या बेछूट,तर्कहीन आणि अविचारी फैरी चालवायचा म्हटलं की विरोध 'कुठं' करायचा ते हि कळलं पाहिजे....!मोदींच्या आणि संघाच्या द्वेषापायी मोदीद्वेष्ट्यांचा हा विवेकच गहाळ झालाय का असा प्रश्न पडतो तो यामुळेच.©

टीप-
१)
" The Prime Minister hails from Mahatma Gandhi's home state and
defence minister comes from Goa which never had a 'martial race'.
And then take this surgical strike. This was a different kind of
combination. May be the RSS teaching was at the core," said
Parrikar at an event in Ahmedabad's Nirma University.
http://toi.in/B-G3Pb/a19li