Wednesday, 26 May 2021

      'जीवन दुःखमय आहे' हे बुद्ध मान्य करतो म्हणून तो मोठा ठरतो, ‘आयुष्य आनंदी आहे फक्त दृष्टिकोन बदला’सारख्या positivity trap मध्ये तो स्वतः अडकत नाही आणि म्हणूनच इतरांनाही अडकवत नाही. ‘मी मोक्षदाता नाही तर मोक्षपथदाता आहे.’ इतकी स्पष्टता त्याच्या ठायी आहे,देव आहे वा नाही या आभासी प्रश्नांपेक्षा जगण्याचे वास्तविक प्रश्नांना तो थेट भिडतो,आपल्या बरोबर इतरांना त्या मार्गात येण्याचा मध्यम मार्ग-‘मज्जमिका’ दाखवतो,त्या मार्गावरून निब्बान प्राप्त होऊ शकते अशी त्याला खात्री आहे तथागतानी निब्बान विषयी भंते पटीसेन यांना उपदेश करताना म्हटले जो राखून बोलतो,विचारांचा संयम करतो,जो आपल्या देहाने दुसर्‍यास उपद्रव करीत नाही असा मनुष्य निब्बान मिळवू शकतो.राजपुत्र असलेल्या आणि सर्वसंगपरित्याग केलेल्या गौतमाबद्दल भारतीय समाजमनात एक उपजत आदर आहे,(याचं कारण दुसऱ्याने केलेला त्याग हा आपल्याला अतिप्रिय आहे. )त्याची तत्व अनेक रूपात पुढे येत गेली,अगदी गांधीजींच्या तात्त्विक गाभ्यात वैष्णव परंपरेसारखीच बुद्धाची परंपराही सापडते,याचं कारण बुद्धाच्या स्पष्टतेत आहे,हि स्पष्टताच त्याला मोठं बनवते,एखाद्या चिरातन बोधीवृक्षासारखी......!

Monday, 22 March 2021

यात्रा

उद्या पुन्हा नवा दिवस,
पण पान मात्र जुनचं ,
चुरगळेलेलं,
मळलेलं,
पेन्सिलच्या रेघोट्या,
हायलाईटरच्या खुना,
Bookmarks चिकटवलेलं.
व्यक्ती तितक्या प्रकृती,
विद्यार्थी तितकी पाने.
एका अशाश्वताकडून दुसऱ्या अशाश्वताकडे जाणारा हा प्रवास,
निकालाची फिकीर न करता पुढे जाणारा,
उरणार नाही मारणार नाही, घेतला वसा टाकणार नाही
म्हणत ही गर्दी पुन्हा दिसेल.
मानामोडून अभ्यास करत,
ढेकणांच्या सहवासात रात्री घालवत,
'लक्ष्मीकांतची' पारायणं करत,
चौकात १/२ चहा मारत,
पाठीला जड सॅक अडकवून,
झेरॉक्सवाल्याचा उंबरठा झिजवत.
हि गर्दी जमत राहिलं,
नवे लोकं येत राहतील.
मंडप-दीपमाळा-महिरप -कळस,
बदलत जाईल काळाबरोबर,
पण मखरातला देव मात्र constant राहतो,
पिढ्या बदलतात, तरी यात्रा भरतच राहते.....!
                                             
                                             - निखील कुलकर्णी

Sunday, 21 March 2021

कविता

उगीचच कागदावर
माराव्यात चार रेघोट्या,
शाईने डबडबलेलं पेन शिंपडावं
पांढऱ्या-कोऱ्या कॅनव्हासवर.
मग त्या ओघळलेल्या शाईच्या थेंबातून,
जन्माला येऊ लागतात कविता.

हातात हात धरून,
फेर मांडून नाचू लागतात,
उगाचच.
गोल गिरक्या घेत कधी,
आकाशाला चुंबू पाहतात.
जमिनीवर कोसळून,
धाय मोकलून
कधी कधी रडू कोसळतात.

पडलेल्या त्या थेंबातूनच पेटून उठतो अंगार कधी,
मग माणसांचे संगर जिवंत होतात
आणि अन्यायाला वाचा फुटते.
पेटतात वणवे ओल्या सच्छिद्र लाकडातून,
आणि शांतरस पिऊन विझतातसुद्धा आलिप्तपणे.

कॅनव्हासवर शिंपडलेल्या ओघळातून,
साकारत जातं एक-एक चित्र
मुर्त-अमूर्त भावनांचं.
अंतरीच्या वेदनांच्या थारोळ्यात अंकुरलेल्या या जीवलाच,
तुम्ही-आम्ही कविता म्हणतो.
                                        -निखील©

(जागतिक कविता दिनानिमित्त......)