Saturday, 25 March 2017

आमचे दुसरे पत्र.

प्रिय तात्यास,
              आज अनेक दिवसांनी पत्र लिहायला घेतले.त्यास कारणही तसेच हो,आपल्याकडे हल्ली digital आप्तेष्ट फक्त सणासुदीला आठवावे असा नवीन प्रघात पडत चालला आहे.तुला माहितीच आहे की मला काळाच्या मागे राहावयास आवडत नाही म्हणून बदलणाऱ्या काळातल्या चुकीच्या परंपरादेखील मी पाळतो.असो.तसाही मला इतके दिवस पत्र लिहायला वेळ नव्हता.त्याची अनेक कारणे आहेत बाबा.
      एकतर आमच्या देशात पंतप्रधानांनी नोटबंदी करून पाहिली.पाचशे-हजारच्या नोटाच एका रात्री बंद.माझ्या खिशातला सगळा खुर्दा खुळखुळला तरी ७१२ रुपये आणि आठ आणे मिळाले.यात पाचशेची एकही नोट नाही,म्हणून मी मजा बघायला बँकेच्या रांगेत जाऊन उभा राहायचो,उरल्या वेळात फेसबुकवर पोस्टी चिकटवायचो.या सगळ्या प्रकारात मला तर आपण अर्थशास्त्राची डॉक्टरेट घ्यावी असे वाटू लागले..पण शेवटी मी तो नाद सोडून दिला.
          मागे आठवड्या-दोन आठवड्यापूर्वी सुद्धा मला अचानक राजकीय विश्लेषक व्हायची लहर आली होती.आता तो कुणी योगी मुख्यमंत्री केलाय बाबा त्या भैय्यांनी.मी काल मुलाला तेच म्हणालो,"मी संन्यास घेऊन बाबा झालो असतो तर माझ्या ब्रह्मचर्याच्या तेजाने तुला मिरजेला डॉक्टर व्हायला धाडले असते." पण ते सुद्धा फार संप करतात हल्ली.पेपर उघडला कि जाहिरातींपेक्षा संपाच्या बातम्याच जास्त.पुर्वी पेपर मध्ये किती जाहिराती यायच्या अरे म्हणून सांगू,पण 'टाइम्स'हॅव चेंजड.म्हणून मी पेपर वाचनेच बंद केले.
           तुझे काय सुरु असते हल्ली?ट्रम्प काशीयात्रेला सबसिडी देणार आहे म्हणे.एखादी आमच्या विश्वेश्वराला दे म्हणावं.तेवढीच पुढची टर्म मिळेल...काय म्हणता?
बाकी यावेळी आंबे फक्कड येतील असे दिसते.तुस फोटो पाठवेनच.नात्यांचा गोडवा फोटोच्या माध्यमातून टिकतो हे काय कमी थोडीच आहे..!
                                                  तुझाच,
                                                स.दा.भोळे
                 (ज्येष्ठ अर्थतज्ञ आणि राजकीय विश्लेषक तसेच प्रगतिशील शेतकरी)

   

Tuesday, 21 March 2017

कवितेचा जन्म

उगीचच कागदावर
माराव्यात चार रेघोट्या,
शाईत डबडबलेलं पेन
शिंपडावं पांढऱ्या-कोऱ्या कॅनव्हासवर.
त्या ओघळलेल्या शाईच्या थेंबातून,
जन्माला यायला लागतात कविता.
हातात हात धरून,
फेर मांडून नाचू लागतात.
उगाचच.
गोल गिरक्या घेत कधी,
आकाशाला चुंबू पाहतात.
जमिनीवर कोसळून,
धाय मोकलून
कधी कधी रडू कोसळतात.
पडलेल्या त्या अक्षरातूनच पेटू उठतो विखार कधी,
मग माणसांचे संगर जिवंत होतात
आणि अन्यायाला वाचा फुटते.
पेटतात वणवे ओल्या सच्छिद्र लाकडातून
आणि शांतरस पिऊन विझतात आलिप्तपणे.

मग कॅनव्हासवर शिंपडलेल्या ओघळातून,
साकारत जातं एक-एक चित्र
मुर्त-अमूर्त भावनांचे.
अंतरीच्या वेदनांच्या थारोळ्यात
अंकुरलेल्या या जीवलाच,
तुम्ही-आम्ही कविता म्हणतो.©

(जागतिक कविता दिनानिमित्त......)