Friday, 15 July 2016

दर्शन

छायाचित्र:इंटरनेटवरून साभार)
“ माऊली चला पुढे....”
    सेवेकर्यांच्या ललकारीसरशी रंग पुढे सरकली,जवळपास १८ तास वारकरी रांगेत उभे,नाम्याही त्यातलाच एक.चाळीशीत असेल त्याच वय.गव्हाळ वर्ण,पाच-साडेपाच फुटाच्या आतबाहेरची उंची,वापरून मातकट रंगाच झालेलं धोतर,अंगात सदरा आणि खांद्यावर ठिगळ लावलेली घोंगडी.चालून-चालून पाय सुजलेले.पण अजून चार-दोन तासात विठुरायाचं दर्शन होणार म्हणून सुखावला होता बिचारा.
“ माऊली चला पुढे....” पुन्हा एकदा रंग पुढे सरकली खरी पण नाम्याच्या समोर रांगेत उभा असलेला म्हातारा धाड्कन खाली बसला.कष्टाने भोवल आली त्याला.साठीच्या पार उमर गेली होती,रंग रापलेला होता,डोईला मुंडास बांधल होत.कपाळावर गंधमात्र उठावदारपणे लावलेलं.
“काय हुतय बाबा तुम्हांला?” नाम्याने विचारलं.आजूबाजूची गर्दी स्वत:ची जागा सांभाळत निश्चलपणे उभी होती.
“जीव घुसमटला रे पोर,जेवलो बी न्हाई.”,म्हातारा उत्तरला.
“पाय बी सुजल्यात,लई टाईम झाला उभा हाये इथं,मला बाहीर नेऊन सोडतो का रे लेकरा”,म्हातार्याने पुस्ती जोडली.
    त्याच्या अनवाणी सुजलेल्या पायाकडे बघून नाम्याचं काळीज कालवल,त्यात त्याच्या स्निग्ध ‘लेकरा’ अशा हाकेने तर तो पार विरघळला.
“पण बाहेर जायचं म्हंजी रांगेत पुन्हा उभं राहावं लागेल,दर्शन नाही भेटणार...”काहीशा विचारमग्नतेत त्याने समजावलं स्वत:ला,डोळ्यात दाटलेलं पाणी पुसलं आणि हात जोडून तो रांगेतून बाहेर पडला.
        रात्रीचे बारा वाजून गेले होते.मंदिराच्या बाहेर आल्यावर म्हाताऱ्याने जेवणाचा हट्ट धरला...त्याच्याकडे पैसेही नव्हते.तसे नाम्याकडेही पैसे नव्हतेच पण पोटाला चिमटा काढून भाड्यापुरते पैसे बाजूला काढून त्याने म्हाताऱ्याला चहा पाजला,जेवण दिल.मंदिर आता मागे पडल होत.थोडं पुढ आल्यावर एका शांत ठिकाणी दोघेही आडवे झाले.नाम्याचे पाय एव्हाना चांगलेच ठणकू लागले होते.हवेत अंमळ गारवा होता.खांद्यावरची घोंगडी त्याने म्हातार्याच्या अंगावर टाकली आणि देवाच नाव घेतलं.डोळे मिटले आणि तो झोपेत हरवला.

        कसल्याशा प्रकाशाने नाम्याची झोपमोड झाली.शेजारी झोपलेला म्हातारा जागेवर नव्हता.डोळे किलकिले करून प्रकाश कसला म्हणून त्याने बघितलं तर, शतसूर्यांच तेज ल्यालेलं ‘सुंदर ते ध्यान’ डाव्या खांद्यावर ठिगळ लावलेली घोंगडी घेऊन नाम्याकडे कौतुकाने बघत उभं होत.नाम्याच्या डोळ्यातून संततधार वाहात होती.मंदिरातून अजूनही “चला पुढे....”च्या ललकाऱ्या घुमत होत्या.

Wednesday, 6 July 2016

सुलतान:चित्रपट समीक्षण

सुलतान
         सलमान खानचा बहुप्रतिक्षित सुलतान आज प्रदर्शित झाला.एक पैलवान त्याची महत्वकांक्षा आणि त्याचं प्रेम याभोवती फिरणारी हि कथा.सुलतान(सलमान खान) हा हरियाणातला एक उनाड मुलगा आरफाच्या(अनुष्का शर्मा) प्रेमात पडतो आणि तिला impress करायला म्हणून पैलवानी सुरु करतो.'तुझ्या आयुष्यात काहीच लक्ष्य नाही' म्हणून आरफा त्याला नाकारते तेव्हा जिद्दीने पेटलेला सुलतान खुप कष्ट घेऊन पैलवान म्हणून नावारूपाला येत जातो.अगदी ऑलिम्पिक गोल्ड मेडल सुद्धा जिंकतो पण यानंतर त्याच्या कौटुंबिक आयुष्यात आलेली वादळं आणि त्यातून त्याच कुस्तीला रामराम ठोकण (पुन्हा एकदा) आरफाला  मिळण्यासाठी एका wrestling league मध्ये भाग घेतो आणि शेवटी भारतीय चित्रपट परंपरेला साजेल असा जिंकतो,त्याच कौटुंबिक जीवन सुरळीत सुरु होतं. '...ते दोघे सुखाने नांदू लागले'च्या चालीवर चित्रपट संपतो.
               या चित्रपटाची मुख्य ताकद आहे ती म्हणजे अर्थातच सलमान.पैलवान सुलतान खान दिसण्यासाठी त्याने अपार मेहनत केली आहे.पन्नाशीत अशा पद्धतीची body केवळ सलमानच बनवू शकेन.त्याचं हरियाणवी बोलणं,त्याच चालणं कुस्तीचे असतात ते डाव हे सगळं तुम्हांला खिळवून ठेवतं.अनुष्का शर्माचा अभिनयही चांगला आहे.Punjabi girl साकारण्यात तिची हातोटी तिने पुरेपूर वापरली आहे.म्हणजे आजवरच्या बऱ्याच चित्रपटात तिने साकारलेल्या पंजाबी मुलीपेक्षा आरफा वेगळी आहे.रणदीप हुडाला काम छोट आहे पण जे मिळालंय त्याच त्याने सोनं केलंय,खरं कौतुक करावं वाटतं अमित सिधचं,चित्रपट पुढे नेण्याचं काम तो लीलया करत जातो.परीक्षित सहानी साहेबांचं दर्शनही सुखावह ठरत.विशाल-शेखरनी गाणे चांगले बनवलेत,cinematographही उत्तम.कुस्तीचा थरार अक्षरशः उभा राहावा म्हणून cameramanला द्यावं तेवढं श्रेय कमीच आहे.चित्रपट प्रवाही झाला आहे आणि प्रभावी देखील त्याचा वाटा अर्थातच अली अब्बास जफर या दिग्दर्शकाचा.
             एकूणच सलमान एके सलमान आणि सलमान दुणे दोनशे कोटी हे समीकरण सुलतानाही कायम ठेवेल. यात शंका नाही.