Saturday, 10 September 2016

तो

"चांगुलपणा एवढं वाईट काही नाही जगात..."
         इतकं टोकाचं नकारात्मक कोण बोललं म्हणून मी मागे बघितलं,तो उभा होता.पन्नास-पंचावन्न वय असावं,उंची तशी बेताचीच,जाड काड्याचा भिंगाचा चष्मा,पायघोळ पायजमा, अंगात सैलसर पांढरा शर्ट,डाव्या हातात एक कापडी पिशवी,उजव्या हातात चहाचा ग्लास धरत आपल्या मित्राला तो हे सांगत होता.आजच्या युगात एवढा ८०च्या दशकातला पोशाख केलेला आणि इतका नकारात्मक बोलणाऱ्या गृहस्थाच मला पहिल्यांदा हसू आलं....चहा संपवून मी आणि माझे मित्र विनोदात बुडालो,'त्याच' तत्वज्ञान सुरूच होतं,
"म्हणून सांगतो तुला,इतके उपकार करू नयेत कुणावर रे..."
त्याने आपल्या अनुभवाची शिदोरी पुन्हा एकदा सार्वजनिकपणे खुली केली,हातातला चहाचा ग्लास टेबलवर आदळून सुट्टे दहा रुपये त्याने काऊंटवर दिले आणि पायातली करकरती पुणेरी वहाण वाजवत तो चालायला लागला.तो दृष्टीआड होईपर्यंत मी त्याची ठेंगणी मूर्ती बघत होतो.
    उन्हे कलायला लागली की ओंकारेश्वराच्या पुलावर आमचा मित्रमेळा जमत असे.(म्हणजे अजूनही जमतो)मग हास्यविनोदापासून राजकारणापर्यंत आणि महाराष्ट्राच्या पुरोगामित्वापासून ते अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदापर्यंत अनेक भौतिक-आधिभौतिक विषय चघळत बसायची आमची पुणेरी सवय.रोजच्या शेंगदाणेवाल्याकडून खाऱ्या दाण्याची पुरचुंडी घ्यायची आणि ती संपेपर्यंत गप्पा झोडत बसायच्या.
"तो पक्षी गरुड आहे की घार आहे?" एक पृच्छा.
"घार आहे रे ती,गरुड एवढा लहान नसतो.."निरसन
"अरे पण ती छोटी घार असू शकेल ना?" थोडीशी तिरकस शंका...
अशी काहीशी बोलणी चालू होती,हातातले शेंगदाण्याच्या पुडीशी चाळा करत मी शांतपणे ऐकत होतो.
तेवढ्यात 'सफर'चं 'जो तुम को हो पसंद वही बात करेंगे...' ऐकू आलं.
मी 'लाजवाब' म्हणून शेजारी बघितलं तर 'तो' फुटपाथवर बसलेला.
लेस लावलेला एक जुना मोबाईल खिशात ठेऊन तो गाणी ऐकत होता.
आजूबाजूच्या जगाचं त्याला फारसं देणं-घेणं नव्हतं...आपण ऐकत असलेल्या गाण्यामुळे कुणाला त्रास होतोय याची ना तमा होती ना कुणाला आनंद होतोय याची जाणीव.अजून चार-पाच गाणी ऐकून त्याने घड्याळाकडे बघितलं.आणि गाणी बंद करून आपली कापडी पिशवी उचलली.खिशातून विडी काढून ती पेटवली.ती ओढण्याची देखील त्याची एक लकब होती,तर्जनी आणि अंगठ्याच्या मध्ये विडी धरून ती तो ओढत असे.त्याच्या चालण्याच्या त्या  कर्रssकर्र आवाजाबरोबर तो अदृश्यही झाला.
           त्यानंतर अनेकदा तो त्या पुलावर दिसायचा,त्याच वेळेला गाणी ऐकत.आठ वाजले की निघून जायचा.त्याचं गाण्यांचा संग्रह  मात्र सुंदर होतं.कुमारपासून किशोरपर्यंत अनेक गाणी तो ऐकत असे,ऐकवत असे.स्वरांच्या जलौघात न्हाऊनही  हा मनुष्य इतका कोरडा कसा शकतो याचं कोडं मला राहून राहून वाटे.

"तुमचं गाण्याचं collection छान असतं."
शिष्टाचाराची पारंपरिक पद्धत न पाळता मी त्याला compliment दिली.
आपली समाधी भंग करणारा हा कोण ? या प्रश्नार्थक भावाने त्याने माझ्याकडे त्रासिकपणे पाहिलं.
मला याची अपेक्षा होतीच म्हणून मी माझ्या ठेवणीतलं दुसरं हत्यार काढलं..
"कुठून जमवलीत एवढी गाणी?"
"हम्म्म..."
तो काहीसा गोंधळला,त्याच्या डोळ्यांची चमत्कारिक उघडझाप झाली.
"चहा घेणार?"
माझ्या या प्रश्नावर त्याने अनिच्छेने मंद स्मित केलं आणि नको म्हणाला.
घड्याळाकडे बोट दाखवत,
"आता जायची वेळ झाली.."
असं पुटपुटला आणि चालायला लागला.
   त्यानंतर तो अनेकदा दिसत असे,
कधी कधी नमस्कार-चमत्काराचे सोपस्कारही पार पडत.
पण शिष्टाचाराच्या परीटघडीला मोडून त्याने कधी आमच्याशी संवाद साधला नाही आणि त्याच्या जिवंत समाधीतून आम्ही त्याला कधी बाहेर काढलं नाही.
      नंतर बराच काळ परीक्षांमुळे मी त्या पुलावर गेलो नाही.
हल्ली त्याच्याबरोबर त्याच्या तो चहा पिणारा मित्र येत असे.
हा त्याच्यापेक्षा फारच वेगळा.साडेपाच फुटाच्या आत बाहेरची
उंची,पोट सुटलेलं,दाढीचे खुंट वाढलेले आणि आपल्या वयाला न शोभणारा
टीशर्ट घातलेला,हातात एक रंगीबेरंगी रुमाल.तो मात्र आमच्या बरोबर बोलायचा....
त्याचा मित्र अगदीच भिन्न प्रवृत्तीचा,त्याच्या आयुष्याला वळणं वैगेरे असं काही नव्हतचं.कायम टीशर्ट घालणाऱ्या माणसाच्या आयुष्याला परीटघडी कसली म्हणा?निर्मात्याने दोन वेगळ्या साच्यातून काढलेले हे दोघे एकत्र कसे राहतात याचं मला नवल वाटे.
काही काळाने त्याच्याशी ओळख वाढली,
एकदा सहज चहाच्या टपरीवर मी त्याला विचारलं
"का ओ? तुमचे ते मित्र असे तंद्रीत का असतात कायम?"
"कोण तो ना?" त्याने विचारलं
"हो?"
"तसा नव्हता तो पूर्वी,४० वर्ष ओळखतो मी त्याला.
पूर्वी तो हि नीट होता,लहानपणीच वडील गेले.गरीबीत वाढून मॅट्रिक झाला आणि नोकरी लागली.
लग्न झालं.सगळं सुखाने सुरु होतं.पण सुख 'खो' घालतं म्हणतात ना ते असं बघा.
"म्हणजे?"
"त्याचा मुलगा गेला,चार-पाच वर्षांचा असेल...
विषमज्वर झाला त्याला,नीट उपचार मिळाले नाहीत.त्यात तो गेला.  तो गेला आणि इकडे आमच्या वहिनींना वेड लागलं पुत्रशोकाने,त्या वेड्यांच्या इस्पितळात."
"अरेरे..." मला हळहळून आलं.
"आई आणि हा दोघेच,मग आई गेली काही वर्षांनी.थकलीच होती म्हातारी.
ती गेल्यावर याने असलेली नोकरी सोडली आणि सरावाच्या दारिद्र्याबरोबर पुन्हा संसार सुरु झाला."
डोळ्यात दाटलेलं पाणी नकळतपणे आपल्या रंगीबेरंगी रुमालाला पुसत त्याचा मित्र मला सांगत होता...
मी सुन्नपणे सगळं ऐकत होतो,
जराशा टोचणीने डोळ्यातून पाणी येणारे आम्ही खरे की आयुष्याने जीवनरस शोषून घेतल्यावर डोळ्यांतुन टिपूस न गाळणारा तो खरा?
भितींचे पोपडे उडाले म्हणून आकांत मांडणारे आम्ही अस्सल कि स्वप्नांचे इमले जमीनदोस्त झाल्यावरही त्याच्याकडे निरसपणे बघून बिडी शिलगावणारा हा?
हे मला अजूनही समजलेलं नाही.
आज रुक्ष आणि कोरडा वाटणारा प्रत्येक प्रवाह कधीकाळी तुडुंब भरलेला असतो...
त्यानंतर मला ते दोघे कधीच पुलावर भेटले नाहीत,पण अजूनही संध्याकाळी पुणेरी वहाणेचा कर्रssकर्रर्रर्र आवाज ऐकू आला की माझे कान टवकारले जातात.

समाप्त.
सर्व हक्क लेखकाधीन©

Thursday, 8 September 2016

पर्यावरणाशी मैत्री तर बाप्पाची भक्ती

थोडीशी पार्श्वभूमी:
थोडासा अभ्यास करता असे लक्षात आले की पूर्वी लोक शाडूची मूर्ती बसवूनच गणेशोत्सव साजरा करत असत. आणि शास्त्रात सुद्धा शाडू मातीच्याच(नदीजवळ मिळणाऱ्या मातीपासून) मूर्ती स्थापन कराव्यात अशी आज्ञा आहे.
कालांतराने  व लोकसंख्या वाढीमुळे मूर्त्यांची मागणी वाढली. साहजिकच शाडू च्या तुलनेने बनवण्या स सोप्या आणि जलद असल्यामुळे प्लास्टर ऑफ परिस चा वापर होऊ लागला. नैसर्गिक रंगांऐवजी सहज उपलब्ध रासायनिक रंगांचा वापर वाढला. साच्याचा वापर केल्याने मूर्ती अधिक रेखीव आणि सुंदर वाटू लागल्या. साहजिकच, लोकही त्यांचीच मागणी करू लागले. लवकरच, प्रदुषण वाढू लागले. आणि पर्यावरण मित्र प्रबोधनासाठी पर्यावरण पूरक गणेशोत्सवाचा प्रसार करु लागले.
माझा पर्यावरणपूरक गणेशोत्सव अनुभव:
यावर्षी प्रथमच शाडूची गणेश मूर्ती बसवली. शाडूच्या मूर्ती वर नीट रंग बसत नाहीत. PoP च्या मूर्ती अधिक देखण्या व रेखीव असतात. परंतु  जरा विचार केल्यावर या निकषावर आलो की जिथे भाव महत्त्वाचा तिथे या बाबी फिक्या पडतात. ठरवलं आणि एक छानशी मुर्ती निवडली. घरी आणली. प्राणप्रतिष्ठा करुन मनोभावे पूजा केली. नेहमीच्याच मोठ्या उत्साहात दिड दिवसाचा गणेशोत्सव साजरा केला. निरोप देतानाही प्रथमच घरीच बादलीत विसर्जन केला.  विसर्जनानंतर दोन तासांत शाडू ची मूर्ती पूर्णपणे विरघळते. राहते ती माती आणि पाणी. मग वर आलेलं पाणी झाडांना घातलं आणि तळाशी राहिलेली माती झाडांच्याच मातीत मिसळली.
आपण मूर्ती नदीमध्ये विसर्जन करतो. त्यानंतर त्याचे काय होते कळत नाही. आपला बाप्पा विसर्जन केल्यावर थोडासा वाहत पुढे पुढे जातो आणि थोड्या वेळाने बाजुला विसावतो. त्यानंतर आपण तर तिथून निघतो. परंतु त्या मूर्ती चे काय झाले असेल किंवा होईल अशी सुप्त रुखरुख मनाला कायम सतावते. किमान माझा अनुभव असाच आहे. घरी विसर्जन करताना या वर्षी या रुखरुखीचा प्रश्नच नव्हता. मूर्तीचे काय झाले हे समोर होते. वैज्ञानिक दृष्टया पाहिले तर असे दिसून येते की नदीत विसर्जन करता ती मूर्ती निसर्गालाच मिळते आणि घरी विसर्जन केल्यावर झाडाला घातल्यामुळेही निसर्गालाच मिळते. त्यामुळे त्यातही काही शंका राहिली नाही.
थोडसं वेगळं वाटलं परंतु पर्यावरणाशी गट्टी अधिक दृढ झाल्याचं समाधान वाटलं.
शेवटी हा निसर्ग म्हणजेच देव नाही का?