उगीचच कागदावर
माराव्यात चार रेघोट्या,
शाईने डबडबलेलं पेन शिंपडावं
पांढऱ्या-कोऱ्या कॅनव्हासवर.
मग त्या ओघळलेल्या शाईच्या थेंबातून,
जन्माला येऊ लागतात कविता.
हातात हात धरून,
फेर मांडून नाचू लागतात,
उगाचच.
गोल गिरक्या घेत कधी,
आकाशाला चुंबू पाहतात.
जमिनीवर कोसळून,
धाय मोकलून
कधी कधी रडू कोसळतात.
पडलेल्या त्या थेंबातूनच पेटून उठतो अंगार कधी,
मग माणसांचे संगर जिवंत होतात
आणि अन्यायाला वाचा फुटते.
पेटतात वणवे ओल्या सच्छिद्र लाकडातून,
आणि शांतरस पिऊन विझतातसुद्धा आलिप्तपणे.
कॅनव्हासवर शिंपडलेल्या ओघळातून,
साकारत जातं एक-एक चित्र
मुर्त-अमूर्त भावनांचं.
अंतरीच्या वेदनांच्या थारोळ्यात अंकुरलेल्या या जीवलाच,
तुम्ही-आम्ही कविता म्हणतो.
-निखील©
(जागतिक कविता दिनानिमित्त......)
No comments:
Post a Comment