सेवेकर्यांच्या ललकारीसरशी रंग पुढे सरकली,जवळपास १८ तास वारकरी रांगेत उभे,नाम्याही
त्यातलाच एक.चाळीशीत असेल त्याच वय.गव्हाळ वर्ण,पाच-साडेपाच फुटाच्या आतबाहेरची उंची,वापरून
मातकट रंगाच झालेलं धोतर,अंगात सदरा आणि खांद्यावर ठिगळ लावलेली घोंगडी.चालून-चालून
पाय सुजलेले.पण अजून चार-दोन तासात विठुरायाचं दर्शन होणार म्हणून सुखावला होता
बिचारा.
“ माऊली चला पुढे....” पुन्हा एकदा रंग पुढे
सरकली खरी पण नाम्याच्या समोर रांगेत उभा असलेला म्हातारा धाड्कन खाली
बसला.कष्टाने भोवल आली त्याला.साठीच्या पार उमर गेली होती,रंग रापलेला होता,डोईला
मुंडास बांधल होत.कपाळावर गंधमात्र उठावदारपणे लावलेलं.
“काय हुतय बाबा तुम्हांला?” नाम्याने
विचारलं.आजूबाजूची गर्दी स्वत:ची जागा सांभाळत निश्चलपणे उभी होती.
“जीव घुसमटला रे पोर,जेवलो बी न्हाई.”,म्हातारा
उत्तरला.
“पाय बी सुजल्यात,लई टाईम झाला उभा हाये इथं,मला
बाहीर नेऊन सोडतो का रे लेकरा”,म्हातार्याने पुस्ती जोडली.
त्याच्या अनवाणी सुजलेल्या पायाकडे बघून नाम्याचं काळीज कालवल,त्यात
त्याच्या स्निग्ध ‘लेकरा’ अशा हाकेने तर तो पार विरघळला.
“पण बाहेर जायचं म्हंजी रांगेत पुन्हा उभं राहावं
लागेल,दर्शन नाही भेटणार...”काहीशा विचारमग्नतेत त्याने समजावलं स्वत:ला,डोळ्यात
दाटलेलं पाणी पुसलं आणि हात जोडून तो रांगेतून बाहेर पडला.
रात्रीचे
बारा वाजून गेले होते.मंदिराच्या बाहेर आल्यावर म्हाताऱ्याने जेवणाचा हट्ट
धरला...त्याच्याकडे पैसेही नव्हते.तसे नाम्याकडेही पैसे नव्हतेच पण पोटाला चिमटा
काढून भाड्यापुरते पैसे बाजूला काढून त्याने म्हाताऱ्याला चहा पाजला,जेवण दिल.मंदिर
आता मागे पडल होत.थोडं पुढ आल्यावर एका शांत ठिकाणी दोघेही आडवे झाले.नाम्याचे पाय
एव्हाना चांगलेच ठणकू लागले होते.हवेत अंमळ गारवा होता.खांद्यावरची घोंगडी त्याने
म्हातार्याच्या अंगावर टाकली आणि देवाच नाव घेतलं.डोळे मिटले आणि तो झोपेत हरवला.
कसल्याशा प्रकाशाने नाम्याची झोपमोड झाली.शेजारी
झोपलेला म्हातारा जागेवर नव्हता.डोळे किलकिले करून प्रकाश कसला म्हणून त्याने
बघितलं तर, शतसूर्यांच तेज ल्यालेलं ‘सुंदर ते ध्यान’ डाव्या खांद्यावर ठिगळ
लावलेली घोंगडी घेऊन नाम्याकडे कौतुकाने बघत उभं होत.नाम्याच्या डोळ्यातून संततधार
वाहात होती.मंदिरातून अजूनही “चला पुढे....”च्या ललकाऱ्या घुमत होत्या.

No comments:
Post a Comment