Thursday, 8 September 2016

पर्यावरणाशी मैत्री तर बाप्पाची भक्ती

थोडीशी पार्श्वभूमी:
थोडासा अभ्यास करता असे लक्षात आले की पूर्वी लोक शाडूची मूर्ती बसवूनच गणेशोत्सव साजरा करत असत. आणि शास्त्रात सुद्धा शाडू मातीच्याच(नदीजवळ मिळणाऱ्या मातीपासून) मूर्ती स्थापन कराव्यात अशी आज्ञा आहे.
कालांतराने  व लोकसंख्या वाढीमुळे मूर्त्यांची मागणी वाढली. साहजिकच शाडू च्या तुलनेने बनवण्या स सोप्या आणि जलद असल्यामुळे प्लास्टर ऑफ परिस चा वापर होऊ लागला. नैसर्गिक रंगांऐवजी सहज उपलब्ध रासायनिक रंगांचा वापर वाढला. साच्याचा वापर केल्याने मूर्ती अधिक रेखीव आणि सुंदर वाटू लागल्या. साहजिकच, लोकही त्यांचीच मागणी करू लागले. लवकरच, प्रदुषण वाढू लागले. आणि पर्यावरण मित्र प्रबोधनासाठी पर्यावरण पूरक गणेशोत्सवाचा प्रसार करु लागले.
माझा पर्यावरणपूरक गणेशोत्सव अनुभव:
यावर्षी प्रथमच शाडूची गणेश मूर्ती बसवली. शाडूच्या मूर्ती वर नीट रंग बसत नाहीत. PoP च्या मूर्ती अधिक देखण्या व रेखीव असतात. परंतु  जरा विचार केल्यावर या निकषावर आलो की जिथे भाव महत्त्वाचा तिथे या बाबी फिक्या पडतात. ठरवलं आणि एक छानशी मुर्ती निवडली. घरी आणली. प्राणप्रतिष्ठा करुन मनोभावे पूजा केली. नेहमीच्याच मोठ्या उत्साहात दिड दिवसाचा गणेशोत्सव साजरा केला. निरोप देतानाही प्रथमच घरीच बादलीत विसर्जन केला.  विसर्जनानंतर दोन तासांत शाडू ची मूर्ती पूर्णपणे विरघळते. राहते ती माती आणि पाणी. मग वर आलेलं पाणी झाडांना घातलं आणि तळाशी राहिलेली माती झाडांच्याच मातीत मिसळली.
आपण मूर्ती नदीमध्ये विसर्जन करतो. त्यानंतर त्याचे काय होते कळत नाही. आपला बाप्पा विसर्जन केल्यावर थोडासा वाहत पुढे पुढे जातो आणि थोड्या वेळाने बाजुला विसावतो. त्यानंतर आपण तर तिथून निघतो. परंतु त्या मूर्ती चे काय झाले असेल किंवा होईल अशी सुप्त रुखरुख मनाला कायम सतावते. किमान माझा अनुभव असाच आहे. घरी विसर्जन करताना या वर्षी या रुखरुखीचा प्रश्नच नव्हता. मूर्तीचे काय झाले हे समोर होते. वैज्ञानिक दृष्टया पाहिले तर असे दिसून येते की नदीत विसर्जन करता ती मूर्ती निसर्गालाच मिळते आणि घरी विसर्जन केल्यावर झाडाला घातल्यामुळेही निसर्गालाच मिळते. त्यामुळे त्यातही काही शंका राहिली नाही.
थोडसं वेगळं वाटलं परंतु पर्यावरणाशी गट्टी अधिक दृढ झाल्याचं समाधान वाटलं.
शेवटी हा निसर्ग म्हणजेच देव नाही का?

No comments:

Post a Comment