प्रिय जवाहर,
तुला आता आठवतही नसेल कदाचित,
स्वातंत्र्याच्या लढ्यात तुझा तो आवेश,
पुर्ण स्वातंत्र्याचा आग्रह,
मला तुझ्याकडे खेचून आणायचा.
स्वातंत्र्याच्या दिवशी एखाद्या राजपुत्रासारखा
खादीच्या शुभ्रवस्त्रांनी नटलेला तु,
हातात मंगलकलश घेऊन चालत होतास नेटाने
आम्हां सर्वांच्या पुढे....
'आपल्या आयुष्यातुन प्रकाश' निघून गेल्यावर,
किती धीरोदात्तपणे सावरलं होतंस तु आम्हांला.
हातात हात धरून नियतिशी किती करार केले होते ना आपण...!
आमच्या स्वप्नांचा सुकाणु तुझ्या हाती देऊन,
निर्धास्तपणे धावत होतो आम्ही तुझ्या मागे.
उन्हा-पावसाची,
थंडी-वाऱ्याची,
तहान-भुकेची ,
तमा न बाळगता...
शांतीवनातल्या गर्द राईमध्ये,
तु पहुडला असशील आज चिरनिद्रेत,
पण मी बघतोय,
तुझ्या विखुरलेल्या राखेतुन
नवा भारत जिवंत होताना..
-निखील©
दोन वर्षांपूर्वी नेहरूंना श्रद्धांजली म्हणून लिहिलेली ही कविता. मागे एकदा एका मित्राला ऐकवली होती.तेव्हा तो म्हणाला होता,"तु Nehruvian आहेस का?"
मी उत्तरलो होतो त्याला,"आधुनिक भारताचं स्वप्न बनणारा प्रत्येक जण Basically Nehruvianच असतो.....!"
No comments:
Post a Comment