"ए पळ पुढे....अपशकुनी कार्ट कुठलं...!"
दारात भिक्षा मागायला आलेल्या त्या सात वर्षांच्या घराविना पोराला सगळेच असं हटकायचे.जन्मतःच मातृप्रेमाला पारख्या झालेल्या त्याला अपशकुनी म्हणून बापानेही त्यागलं अन् बापही परलोकी गेला.वयाच्या अवघ्या दहाव्या दिवशी अनाथ झालेल्या या पोराला त्याच्या दाईने सांभाळलं.चुनिया तिचं नाव.गरिबी असली तरी पोटातली माया तिला स्वस्थ बसू देईना.शकुन-अपशकुनाच्या गोष्टी मनाला स्पर्श करेनात.तिनं त्या बाळाला घरी आणलं आणि त्याचा सांभाळ करू लागली.
बाळ दिसा-मासाने वाढत होता पण आजुबाजुची लोकं त्याला जवळ करत नव्हती.चुनियाचा नवरा तिला ओरडायचा, "कशाला आणलंस त्याला इथे..."
सासू बोट मोडत,"आईबापाला गिळलं तसं आम्हांला गिळेल हो हे पोर...." म्हणायची.
अन एके दिवशी घात झाला....
नदीवर पाणी आणायला गेलेल्या चुनियाला साप चावला आणि ती गेली.तिच्या नवऱ्याने त्या पोराला घराबाहेर काढलं.
तेव्हा पासून दोन वेळच्या जेवणासाठीही तो कोवळा जीव पराधीन झाला.भिक्षांदेही करावी म्हटलं तर कुणी भिक्षाही देईना.
भुकेने कासावीस झालेल्या घरादाराविना-अन नावविना त्या पोराला एक मंदिर दिसलं.रामाचं मंदिर.
देवळाच्या पडवीत बसून आसवं ढाळत तो भुक मारू लागला.
देवळाच्या महंताला त्याची दया आली,नरहरीदास नाव त्यांचं. त्यांनी त्याला दुध दिलं-फळ दिली.नाव गाव पुसलं....
नावच नव्हतं तर सांगणार काय...!
लोकांच्या बोलांनी दुखवलेला ते पोर नरहरीदासांना म्हटलं, "माझ्या जवळ नका येऊ बाबा,माझी काळजी घेणारी लोकं जगत नाहीत जास्त.... मी अपशकुनी आहे ना म्हणून"
नरहरीदास हसले आणि म्हणाले "सगळ्या जगाचा पालनकर्ता तो रामचंद्र.त्याला ना जन्म न मृत्यू....तो सर्वव्यापी आहे.त्याला शरण जा बाळा,तो घेईल तुझी काळजी..."
"अन तो मला कसा भेटेल...?" त्या उपेक्षित जीवाने नरहरीदासांना विचारले.
ये सांगतो म्हणून नरहरीदासांनी मुलाला त्रयोदशाक्षरी कानमंत्र दिला...श्रीराम जयराम जयजयराम.
मुलगा आनंदला..
नरहरीदास म्हणाले,"तुला नाव नाही ना रे...आजपासून तुझं नाव रामबोला.."
देवळातल्या रामाच्या चरणाला मिठी मारून मुलगा रडू लागला.
अनाथ असण्याचे शल्य संपले,
आजपासून तात-माता-बंधू-सखा सगळं सगळं श्रीराम....
त्याच्या डोळ्यांतून आनंदाश्रू वाहू लागले.
रामबोलाला राम मिळाला,आता फक्त स्वतःसाठी नाही जगाला रामकथा सांगायला,विकल मनांना धीर द्यायला.तुम्ही एकटे नाही तर शर-चाप धरलेला राम पाठीशी उभा आहे हे सांगायला.
'दीन दयालु विरद संभारी ।
हरहु नाथ मम संकट भारी ।। म्हणायला.
रामचरितमानस रचायला....
त्यासाठी रामबोलाचा तुलसीदास होणं अजून बाकी होतं.....
No comments:
Post a Comment